Simple essay on today's generation women in Marathi

स्त्री ही कालची, आजची व उद्याची अशी कोणतीही असो स्त्री ही स्त्रीच असते. स्त्री म्हणजे प्रेम, माया, जिव्हाळा, ममता, भावुक, दया, क्षमा, शांती, लक्ष्मीचे रुप असते. स्त्री म्हणजे असे एक अद्भूत रसायन आहे की तिची जादूच फार वेगळी आहे. ऊन, वारा, पाऊस, संकट, अशा कोणत्याही परिस्थितीत तिला काही तरी करायचे असते. त्यासाठी तिला लागणारी ऊर्जा ही ती तयार करत असते म्हणण्यापेक्षा तिला परमेश्‍वरानेच बहाल केलेली आहे.

स्त्री म्हणजे घरातला बाजार, मुलाबाळांची प्रेमळ आई, नवर्‍याची प्रिय पत्नी, घरातील सून, नातेवाईकांचा आधार, कुळाची शान, शेजारणीची सखी, लाडक्या भावाची भोळी बहीण. स्त्री म्हणजे घरातील चिवचिवाट.

स्त्री म्हणजे घराचा भक्‍कम पाया असतो. तिच्या भरवशावर तुम्ही घरावर घरे असे कितीतरी मजले चढवू शकता. कणखर हृदयाची स्त्री कोणत्याही प्रसंगाला धिराने तोंड देते कालची स्त्री ही परंपरेच्या बुरख्याखाली होती. तिच्यावर जुन्या व बुरसट विचारांचा पगडा होता. बंधनाच्या स्नेह जाळात तुंतलेली, भीतीच्या गर्तेत बुडालेली होती. बदललेली सुधारित विचारांची घराबाहेर पडणारी, थोडस बंधन झुगारलेली, जिद्द बाळगणारी व स्वत:ला सिद्ध करु पाहणारी अशी ही आज की नारी.

आजची स्त्री विचारांनी स्वैर तर उद्याची नारी ही फारच वेगळी असणार अशी आपण क्षणभर कल्पना करु या.  विचारांचा व संस्कृतीचा पगडा झुगारणारी स्वत:चं मन करिअर, फायदा याला जास्त महत्व देणारी, स्वत:ला जपणारी, नव्या उमेदीने फुलपाखरासारखी उडणारी, कोणाच्याही बंधनात न राहणारी, स्वच्छंदी  आयुष्य जगणारी, फिकीर, तमा न बाळगणारी. म्हणजेच थोडक्यात खट्याळ, नाठाळ, अशी असणार आहे, यात शंकाच नाही.

महाराष्ट्रीयन स्त्री म्हणजे नऊवारी साडी, डोईवर पदर, कपाळावर लाल चुटूक कुंकू, हातभर हिरव्या बांगड्या, नाकात नथ, नजरेत भावुकता, दया, बोलण्यात नम्रता, समर्पण वृत्ती हे सर्व गुण तिच्यात आहेत. पण हळूहळू चित्र बदलायला लागले. साडीतून सलवार कुर्ता, जीनस् टॉपमध्ये असा प्रवास सुरु आहे. पण या परिस्थितीत परंपरा वसंस्कार आबाधित ठेवणारी घराणी अजूनही सुरक्षित आहेत.

एक काळ असा होता की स्त्रिया नवर्‍याच्या शब्दाबाहेर नव्हत्या. तो म्हणेल तिच पूर्वदिशा. अगदी आपल्या आई, आजीने देखील असे दिवस काढलेत.

पण आजच्या पिढीने तंत्रज्ञानाचा अतिरेक, विचार करण्याची पात्रता गमावलेली आहे. त्यामुळे घरादारात, समाजात, अनर्थ घडतायत व नको त्याला कवटाळायची वेळ येतेय. भलंबुरं हा शब्द निरवायला सुद्धा कोणाकडे वेळ नाही.

अरे वेड्यांनो तुम्ही चाललाय कुठे? ती वाट नक्‍कीच प्रगतीकडे चाललीय की विध्वंसाकडे? आजच्या नारीपेक्षा उद्याच्या नारीची कथा ही फारच वेगळी असणार आहे. सर्वांपेक्षा वेगळी, निराळी, स्वत:चं कर्तृत्व जपणारी, प्रसंगी दोनहात करणारी,  अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारी अशीच असणार आहे.  तेव्हा चला परिपूर्ण अशा नारीचे हसत स्वागत करु या.

No comments:

Post a Comment